साखर उद्योगावर होणार मोठा परिणाम
पुणे – राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळातही ऊसतोड मजुरांना स्वगृही परतण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. बुधवारपर्यंत (दि.22) सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार, राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास 90 टक्के मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील 18 हजार मजूर आपापल्या गावी पोहोचले आहेत. उर्वरित सर्व ऊसतोड मजूर येत्या दोन दिवसात आपापल्या गावी पोहोचतील अशी माहिती सूत्रांनी दिली. बीड जिल्हा सीमा प्रवेशाच्या चेकपोस्टवर अधिकृत नोंद झालेले 18 हजार ऊसतोड मजूर आपापल्या गावी परतले असून उदयगिरी शुगर्स बामणी (जि. सांगली) येथून परळीत आलेल्या 18 पैकी दोन व्यक्तींना ताप व घशात खवखव, असे लक्षण आढळून आले. त्यांना तात्काळ आंबेजोगाई येथे करोना चाचणी (स्वॅब टेस्ट) साठी पाठवले असून उर्वरित व्यक्तींना परळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
राज्यात विभागनिहाय पश्चिम महाराष्ट्र 1 लाख 24 हजार, नागपूर विभाग 5 हजार, तर मराठवाड्यात जवळपास दोन हजार असे एकूण 1 लाख 31 हजार ऊसतोड मजूर अडकलेले असून, काहीजण परतीच्या प्रवासात अडकलेले होते. त्यांपैकी आतापर्यंत 18 हजार 67 मजूर गावी परतले आहेत, त्यांना धान्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक प्रशासनाला दिल्या असून, स्थानिक प्रशासनासह सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे कार्यालय तसेच पदाधिकारी या बाबींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आपल्या गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना गावकरी व प्रशासनातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी. ऊसतोड मजूर बांधवांनी आपल्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती व लहान मुले यांच्याशी जवळचा संपर्क टाळावा, तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. राज्यभरातील कोणत्याही ऊसतोड कामगारास कुठलीही अडचण आल्यास त्या-त्या प्रशासनाशी संपर्क साधून त्या सोडविण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत, याची तयारीही करण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.