पवन मावळ – यापूर्वी दोन वेळा पवना धरणाचे पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी अडविण्याचा इशारा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने दिला होता. आता पुन्हा १० फेब्रुवारीला सर्वपक्षीय बेमुदत पाणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन व वारसांना महानगरपालिकेत व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कंपन्यांमध्ये क्षमतेप्रमाणे नोकऱ्या या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन करुन प्रशासनाला धारेवर धरण्याचा इशारा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने दिला. गेल्या वर्षी ९ मे आणि ११ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवडला जाणारे पाणी अडविण्याचा इशारा दिला होता.
मात्र आत्ताही ’अभी नहीं तो कभी नही’ म्हणत धरणग्रस्त आरपारची लढाई करण्यासाठी मुले, जनवरांसह पाण्यात बसणार असल्याची माहिती पवना संयुक्त संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपासुन धरणग्रस्त २३ गावातील खातेदारांना बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी जनजागृती करण्यासाठी गावभेट देणार आहे.
निर्णयासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे अध्यक्ष नारायण बोडके, सचिव बाळासाहेब काळे बाळासाहेब मोहोळ, सल्लागार रविकांत रसाळ, किसन घरदाळे, सुधीर घरदाळे यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारपासून धरणग्रस्त गावात जाऊन धरणग्रस्तांशी याबाबत चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचे समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.