पिंपरी – संचारबंदी आदेशाचा भंग करून रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस सतत कारवाई करीत आहेत. तरीदेखील टवाळखोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. मंगळवारी पिंपरी चिंचवड आयुक्ताच्या हद्दीत तब्बल 87 जणांवर कारवाई केली आहे. गेल्या आठवडाभरात 850 हून अधिक जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
करोना या साथीच्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चपासून संपूर्ण देशात लॉक डाऊन करीत संचारबंदी आदेश लागू केला. नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. यामुळे 25 तारखेपासूनच पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. गेल्या आठवडाभरात 850 हून अधिक जणांवर संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी देखील 90 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मंगळवारीही (दि. 31) आणखी 87 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
अत्यावश्यक सेवेचा पास असल्याशिवाय नागरिकांनी आपली वाहने घराबाहेर काढू नयेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन दिले जाते. तरीदेखील अनेकजण विनाकारण घराबाहेर पडताना दिसून आले आहेत. यापुढील काळात अशा टवाळखोरांवर आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिला आहे.