सोनई – गारपिटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागा नष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. कांदा, गहू, हरभराबरोबरच द्राक्ष, डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने उत्पन्नात प्रचंड घट झाली. द्राक्षांची मोठी हानी झाली. उरलेले द्राक्ष विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने अक्षरशः शेतकऱ्यांना कमी व मातीमोल भावामध्ये द्राक्ष विकावे लागत आहे. शेतकरी रस्त्यावर कडेला बसून द्राक्ष विकत आहेत.
द्राक्ष उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय बाजारपेठला उठाव नसल्याने शेतकरी व्यापाऱ्यांना कमी भावात द्राक्ष विकत आहेत. द्राक्ष उदंड झाले असे परिस्थिती झाल्याने नगर- संभाजीनगर महामार्गवर घोडेगाव पांढरी फुल शेंडी या ठिकाणी रस्त्यावर द्राक्ष विक्रीची दुकाने शेतकऱ्यांनी थाटली असून केवळ 30 ते 40 रुपये किलो दरात द्राक्ष विकत आहेत. त्यामुळे ग्राहकांची चंगळ झाली आहे. महिन्याभरामध्ये तीन ते चार वेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने झोपून काढले. यात द्राक्ष बागायतदार अक्षरश: कोलमडून पडला आहे.
उन्हाळ्यात द्राक्षाला मागणी असते. द्राक्षाला उठाव नसल्याने उरलेले द्राक्ष बागातच पडून आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना देत आहे. शेतकऱ्याला केवळ 20 ते 30 रुपये किलो दरात मिळत आहे. नगर-संभाजीनगर महामार्गावर मोठमोठे स्टॉल लावून शेतकरी रस्त्यावर द्राक्ष विक्रीसाठी बसले आहेत. शेतकऱ्यांवर एक प्रकारे निसर्गाचा कोपाचा परिणाम झाल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. द्राक्षाचे जागोजागी स्टॉल उभे राहिल्याने कधी नव्हे एवढा कमी भाव मिळत असल्याने नागरिकांची चंगळ झाली असेच म्हणावे लागेल.