तळेगाव स्टेशन – शहराचा विकास हा किती इमारती, किती आर्थिक सुबत्ता आहे यावर अवलंबून नसून, त्या शहरामध्ये साहित्य, कला, संस्कृती, नाट्य या सगळ्यांचा वावर कसा आहे, यावर त्या शहराचे वैभव ठरत असते, असे मत महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन इटकर यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवाधाम ट्रस्टचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. किरण देशमुख, डॉ. वर्षा वाढोकर, उद्धव कानडे, पुरुषोत्तम सदाफुले, महेंद्र भारती, शाहीर प्रभाकर वाघोले आदी उपस्थित होते. दरम्यान, सरस्वती विद्यामंदिरच्या शिक्षिका छाया सांगळे, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका अश्विनी काळे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
सचिन ईटकर म्हणाले, की देशाच्या प्रगतीमध्ये सगळ्यात जास्त वाटा शिक्षकांचा आहे. चांगली पिढी घडवण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान हा समाजाच्या दृष्टीने महत्त्वची गोष्ट आहे. तळेगाव आणि मावळ तालुक्याच्या सांस्कृतिक विकास आणि वाटचालीमध्ये नाट्य परिषदेचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी निर्माण केलेला सांस्कृतिक वारसा या शहराचे वैभव आहे.
डॉ. वर्षा वाढोकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. मीनल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. मलिंद निकम, अमित बांदल, ग्रंथपाल घोजगे, राजेश बारणे यांनी परिश्रम घेतले.