उसाला खासगीच्या बरोबरीने दर न दिल्यास सहकारी कारखाने अडचणीत येणार
श्रीगोंदा (समीरण बा. नागवडे )- गेल्या काही हंगामांचा विचार करता ऊस दराच्या बाबतीत खासगी कारखाने वरचढ ठरत आहेत. त्या तुलनेत तालुक्यातील दोन्ही सहकारी कारखाने जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांनी पिछाडीवर आहेत. हीच स्थिती कायम राहिल्यास सहकारी कारखानदारी अधिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
दरवर्षीच्या तुलनेत तालुक्यातील ऊस क्षेत्र निम्म्याने घटले आहे. त्यात तालुक्यातील ऊसावर नगरसह पुणे जिल्ह्यातील खासगी कारखान्यांचा डोळा असतो. त्यातच दराच्या बाबतीत खासगी कारखाने सहकारी कारखान्यांना वरचढ आहेत. आसपासच्या खासगी तसेच काही सहकारी कारखान्यांच्या व तालुक्यातील नागवडे व कुकडी या दोन सहकारी कारखान्यांच्या दरात प्रतिटन सरासरी तीनशे रुपयांची तफावत आहे.
मागील हंगामाचा विचार करता अंबालिका, दौंड शुगर, बारामती ऍग्रो व भीमा पाटस या कारखान्यांनी अठ्ठाविशे ते एकोणतीसशे रुपयांपर्यंत बाजारभाव दिला आहे. त्यात गौरी शुगरची (हिरडगाव) भर पडली आहे. त्याचबरोबर परिसरातील गुन्हाळेही तीन हजारापर्यंत बाजारभाव देऊ लागली आहेत. त्या तुलनेत नागवडे कारखान्याने गेल्या हंगामात 2 हजार 525 तर कुकडीने 2 हजार 500 रुपये दर दिला आहे. त्यामुळे शेतकरी खासगी कारखाने आणि गुऱ्हाळांकडे आकृष्ट होत आहेत.
शिवाय, तालुक्यातील ऊस मिळविण्यासाठी या खासगी कारखान्यांनी तालुक्यात ठिकठिकाणी विभागीय कार्यालये थाटून जोरदार “फिल्डिंग’ लावली आहे. काही खासगी कारखान्यांचे कर्मचारी तर ऊस उत्पादकांकडे जाऊन ऊसाचे “बुकिंग’ करीत आहेत. एका कारखान्याने हंगाम यशस्वी करण्यासाठी मोठ्या बागायतदारांना “ऍडव्हान्स पेमेंट’ देण्याची देखील तयारी चालविली आहे. तालुक्यातील ऊसक्षेत्र लक्षात घेता तीन महिन्यांपर्यंत हंगाम चालविणे कारखान्यांसाठी जिकीरीचे बनणार आहे. त्यामुळे सहकारी कारखान्यांना या हंगामात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.
एकूणच, ऊसाचे घटलेले क्षेत्र, बाजारभावाच्या स्पर्धेत वरचढ ठरणारे खासगी कारखाने व ऊसासाठी “अलर्ट’ असलेली त्यांची यंत्रणा यामुळे सहकारी कारखान्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने वेळीच जागे होऊन “डॅमेज कंट्रोल’साठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. अन्यथा खासगी कारखाने कायमचे वरचढ ठरण्याची आणि सहकारी कारखाने पिछाडीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.