Devendra Fadnavis । लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा काल पार पडला. आता वेध लागले आहेत ते चौथ्या टप्प्याचे. त्यामुळे प्रचारसभांचा धडाका आणखी वाढलाय. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या मुलाखतीत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख कागदी वाघ असा केलाय.
मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी,“उद्धव ठाकरे म्हणत आहेत की अब की बार तडीपार. पण हरकत नाही, कमीत कमी या कारणांमुळे उद्धव ठाकरे लोकांमध्ये जात आहेत. दाल-आटे का भाव आता त्यांना समजला असेल. महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहीत आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्यादिवशी काँग्रेससह जावं लागेल मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करेन. तरीही उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले आहेत. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारस उद्धव ठाकरे आहेत पण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत.” एका इंग्रजी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय.
उद्धव ठाकरे हे कागदी वाघ Devendra Fadnavis ।
“उद्धव ठाकरे हे कागदी वाघ आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकही आंदोलन केलं नाही. कधी तुरुंगात गेले नाहीत. कधीही कुठल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसंच आयुष्यात त्यांनी घोषणाही दिलेल्या नाहीत. आता ते आम्हाला डरपोक म्हणत आहेत. आपल्या देशात पंतप्रधान मोदी असे आहेत ज्यांनी दाखवून दिलं की पाकिस्तानला घरात घुसून मारु शकतो. आता उद्धव ठाकरे ज्यांनी आयुष्यात डासही मारलेला नाही ते आम्हाला पाकिस्तानबाबत सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले असते तर आम्ही ऐकलं असतं. मात्र मच्छरही ज्यांनी मारला नाही त्यांचं आम्ही कशाला ऐकू. असा सवाल त्यांनी यावेळी केला.
हा तर उद्धव ठाकरेंचा निर्ल्लजपणा Devendra Fadnavis ।
“मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला हे सगळ्या देशाला माहीत आहे. कारण पहिल्या दिवसापासून हे ठरलं होतं की भाजपाचा मुख्यमंत्री होईल. सगळ्या प्रचारसभांमध्ये मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही हे सांगत होते की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. उद्धव ठाकरेंनी आम्हाला दगा दिला आहे, आमच्याशी बेईमानी केली आहे. इतकं सगळं करुन आम्हाला दुषणं देणं हा निर्लज्जपणा आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.