नवी दिल्ली : देशात बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचार दरम्यान, पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधत बिहारच्या जनतेने परिवारवादाचा पराभव करून विकासाचा हात पकडला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील अररिया येथील फारबसगंजमध्ये एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
बिहार की पवित्र भूमि ने ठान लिया है कि इस नए दशक में बिहार को नई ऊंचाई पर पहुंचाएंगे। बिहार के लोगों ने जंगलराज को, डबल-डबल युवराजों को सिरे से नकार दिया है: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/eItU630zoh
— ANI_HindiNews (@AHindinews) November 3, 2020
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आणि सुरूवातीची जी महिती मिळत आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की, बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार बनेल. बिहारच्या पवित्र भूमिनं निश्चय केला आहे की यावेळी बिहारचा विकास करायचा आहे. बिहारच्या जनतेनं जंगलराज आणि युवराजांना नाकारलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
“बिहारच्या जनतेला माहित आहे की कोण विकासासाठी काम करतंय. बिहारमध्ये परिवारवाद हरतोय आणि लोकशाही, विकासाचा विजय होत आहे. आज बिहारमध्ये अहंकार हरतोय आणि मेहनत जिंकतेय, बिहारमध्ये घोटाळ्याचा पराभव होत आणि लोकांचा हक्काचा विजय होत आहे, कायद्याचे राज्य आणणाऱ्यांचा विजय होत आहे. मी ते दिवस विसरू शकत नाही जेव्हा या ठिकाणी निवडणुकीची खेळखंडोबा झाला होता. त्यांच्यासाठी निवडणुकीचा अर्थ हिंसाचार, हत्या आणि बूथ कॅप्चरींग होतं. त्यावेळी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात होता आणि मतांची लूट केली जात होती,” असेही मोदी यावेळी म्हणाले.