हेमंत देसाई
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्रयुद्ध अखेर अमित शहा यांच्या खरडपट्टीने संपुष्टात आले, असे म्हणावेसे वाटते. राज्यपालांनी पत्रातील शब्द जपून वापरावे, असे सूचक वक्तव्य केल्यामुळे राज्यपालांची पाठराखण करणाऱ्या इतर भाजप नेत्यांची पंचाईत झाली. या भाजप नेत्यांना गृहमंत्र्यांनी एकप्रकारे घरचा आहेर दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रकृती ठणठणीत आहे, ही खरोखरच चांगली बातमी आहे. शहा यांना करोना झाला होता आणि वारंवार इस्पितळात दाखल व्हावे लागले होते. केंद्र सरकारमधील पंतप्रधान मोदी यांच्यानंतर सर्वांत महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे असल्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष असूनही, पक्षात त्यांच्याच शब्दाला महत्त्व असल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल सर्वांनाच चिंता वाटत होती. मात्र आपण आता पूर्णतः बरे असल्याचे शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, त्यानंतर पश्चिम बंगाल व त्यापुढील टप्प्यात तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार आहेत. जे. पी. नड्डा हे पक्षाध्यक्ष असले, तरी ते शहा यांच्या इशाऱ्यानुसारच काम करतात. पक्षसंघटनेतील प्रत्येक विषय शहा यांच्या सल्ल्यानेच सोडवला जातो. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वाधिक विश्वासातले सहकारी म्हणून अमित शहा यांनाच महत्त्व आहे.
बिहारमधील निवडणुकीत जनता दल सेक्युलर व भाजप यांची आघाडी असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रीय जनता दल व कॉंग्रेस हे उभे ठाकले आहेत. चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. आपल्या मुलाखतीत शहा यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे सांगितले. तसेच नितीश व मोदी यांच्या नावावर मते मागितली जातील व आमचा विजय निश्चित आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नितीशकुमार यांनी गेल्या 15 वर्षांत मुख्यमंत्री म्हणून केलेली कामगिरी ही महत्त्वाचीच आहे. परंतु 2014 पासून मोदी केंद्रात सत्तेवर आहेत आणि त्यांनी बिहारच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले, असेही शहा यांनी सांगितले. एकप्रकारे, मोदी यांची साथ नसती, तर नितीशकुमार स्वबळावर बिहारमध्ये ठोस विकास साध्य करू शकले नसते असेच शहा सुचवत होते. बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.
ज्या ज्या ठिकाणी जदयूचे उमेदवार उभे आहेत, तिथे तिथे लोक जनशक्ती आपले उमेदवार उभे करत आहे. आपले भांडण भाजपशी नसून, जदयूशी आहे ही पासवान यांची भूमिका आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजप लोक जनशक्तीशी दोस्ती करून जदयूला लाथ मारेल, अशी शक्यता आहे.
याबाबतच्या प्रश्नावर बोलताना, पासवान यांचे मन वळवण्याचा आपण प्रयत्न केला, एवढेच उत्तर शहा यांनी दिले. लोक जनशक्तीने मोदी यांचे नाव वापरू नये, असा इशारा भाजपने दिला. त्यावर, माझ्या हृदयात मोदी यांचेच नाव कोरलेले आहे, असे उत्तर चिराग यांनी दिले आहे. या स्थितीत चिरागच्या मदतीने नितीशकुमार यांचे पंख कापण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, हे उघड आहे.
“पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. भाजपसह विरोधी पक्षांचे नेते मारले जात आहेत व लोकशाहीची हत्या केली जात आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची नाही’, असे शहा यांचे मत आहे. प. बंगालमध्ये प्रत्येक जिल्ह्यात बॉंब बनवण्याचे कारखाने असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वास्तविक तसे ते असतील, तर त्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश त्यांनी ममता बॅनर्जी सरकारला द्यायला हवेत. तसे ते दिले आहेत का, याची कल्पना नाही. तसेच उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्णतः मोडीत निघाली आहे. तेथे राजरोस खून पडत आहेत, बलात्कार होत आहेत. परंतु उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे काही शहा यांना वाटलेले नाही.
महाराष्ट्रातील मंदिरे बंद असल्याने, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी उद्धवजींच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला होता. परंतु या पत्रातील शब्द राज्यपालांनी जरा जपून वापरायला हवे होते. त्यांची शब्दांची निवड चुकली, असे स्पष्ट मत अमित शहा यांनी नोंदवले आहे. राज्यपालांनी सरळ सरळ आगाऊपणा केला होता आणि गेले काही महिने त्यांनी राजभवनातून राजकारणच चालवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहून, राज्यपालांची तक्रारही केली आहे.
शहा यांची ही भूमिका हा त्याचाच परिणाम असावा. शहा यांनी राज्यपालांना फटकारल्यामुळे, गेले काही दिवस त्यांची तरफदारी करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचे नेते व प्रवक्त्यांची पंचाईत झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शहा यांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, संबंधित सर्व वादांवर पडदा पडला असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र तरीही भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्यावर पुन्हा एकदा तोंडसुख घेतले आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात तर भातखळकर यांनी चांगलीच तलवारबाजी केली होती. महाराष्ट्रावर सध्या अतिवृष्टीचे संकट कोसळले असून, म्हणूनच सत्ताधारी व विरोधी पक्षांनी बळीराजाच्या मदतीसाठी मैदानात एकदिलाने उतरले पाहिजे.