भोर -गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या वादळी पावसाने भोर तालुक्यात कहर केला असून, या पावसामुळे तालुक्यातील हिर्डस मावळ, आंबवडा, वीसगांव, महुडे, वेळवंड, पसुरे, भुतोंडे खोऱ्यातील काढणीस आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.
भाताचे उभे पीक आडवे झाले असून, कापणी झालेलेही भाताचे पीक खाचरात तुडुंब पाण्यात भिजले असून, हातातोंडाशी आलेले हे पीक वाया गेल्याने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. झालेल्या पिकांचे नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपायी द्यावी अशी मागणी हिर्डोशी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात तीन दिवसांपासून कोसळत आहे. आज (दि. 15) दुपारनंतर चक्री वादळ येण्याची शक्यता असल्याने भोर प्रशासनाने तालुक्याला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने सर्व कार्यालयांतील प्रमुखांना तशा सूचना दिल्या असून, परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असल्याची माहिती भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.
भाटघर-नीरा देवधर ओव्हर-फ्लो
या पावसामुळे भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर ही दोन्ही धरणे “ओव्हर फ्लो’ झाली असून, भाटघर धरण जलाशयातून 5 हजार 600, तर निरादेवघर मधून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. पाण्याचा विसर्ग मोठा असल्याने नागरिकांनी नदी काठी जाण्याचे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यत मागील वर्षी भूस्खलन झालेल्या कोंढरी गावच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू केली आहे. कोणतीही आपत्कालिन पस्थिती ओढवल्यास तहसीलदार कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात दूरध्वनी क्रमांक 02113-223539 संपर्क साधावा.
– राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय अधिकारी, भोर
तालुक्यात अनेक ठिकाणी भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत.घरांची पडझडही झाली आसल्याच्या घटना घडल्या आहेत. उंबरे गावचा स्मशानभूमी रस्ता वाहून गेला आहे.
पारवडी येथील मोहन लिम्हण यांचे, तर पोम्बर्डी येथील राहुल बळीबा खोपडा यांचे घर पडले आहे. पुणे सातारा महामार्गावारील वेळू येथील घरांमध्ये आणि शाळा इमारतीत पाणी शिरून नुकसान झाले आहे. सर्वचनुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. अजित पाटील, तहसीलदार भोर