हाथरस घटनेच्या पडसादानंतर माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल
पुणे – हाथरसमधील घटनेबाबत देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप गप्प का? असा सवाल करीत “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही निव्वळ घोषणा राहिली असून महिलांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.
हाथरस येथे घडलेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ “आम्ही पुणेकर’च्या वतीने रविवारी सायंकाळी मशाल, कॅंडल मार्च काढण्यात आला. यामध्ये सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी मोहन जोशी बोलत होते. लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली मशाल, कॅंडल मार्चला प्रारंभ झाला.
यामध्ये आमदार सुनील टिंगरे, कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती पोकळे, शिवसेना महिला प्रमुख सविता मते, शेतकरी कामगार पक्षाचे सागर आल्हाट, आम आदमी पार्टीचे शहर संयोजक मुकुंद किर्दत, लोकायतच्या अलका जोशी, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी महापौर कमल व्यवहारे आदी मान्यवर सहभागी झाले होते.