मुंबई – देशासह राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर झाली असून कोरोनाबाधितांमध्ये दररोज होणारी वाढ धडकी भरवणारी ठरत आहे. सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट ठरलेला महाराष्ट्र अद्यापही कोरोनाच्या हिट लिस्टवर असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच, पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे आज सकाळी करोनामुळे निधन झाले. ते ४२ वर्षाचे होते. वेळेत उपचार न मिळाल्याने पांडुरंग यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वृत्तामुळे पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
रायकर यांच्या निधनानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भूमिका मांडताना, “पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला? हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला!कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत! त्या COVID centre चे उदघाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली!” अशी मागणी केली आहे.
पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला?
हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला!कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत!
त्या COVID centre चे उदघाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली!— nitesh rane (@NiteshNRane) September 2, 2020
तत्पूर्वी, पांडुरंग रायकर यांना काही दिवसांपूर्वीच थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यांनी करोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. 28 ऑगस्ट रोजी पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या मूळगावी गेले.
मात्र तिथेही त्यांना त्रास सुरू होत असलयाने त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाबाधा असल्याचे स्पष्ट झाले. पुढील उपचारांसाठी कोपरगावमध्येच रूग्णालयात दाखल होण्यासाठी त्यांनी चौकशी केली. या रुग्णालयाने (नाव समजू शकले नाही) त्यांना ४० हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले. पण खर्च जास्त असल्याने त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथे नुकत्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ते उपचारासाठी दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू झाले. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.
मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी ७८ पर्यंत खाली गेल्याने त्यांना जम्बो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक अॅम्बुलन्सची गरज होती. अशी अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री एक अॅम्ब्युलन्स मिळाली. पण, त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या आणखी एका अॅम्बुलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे ५ वाजता अॅम्ब्युलन्स उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचे निधन झाल्याचे सांगितले. याच्या थोड्याच वेळात कार्डिॲक अॅम्ब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती.