मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. दरम्यान परजिल्ह्यांतून येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्टपर्यंतच सिंधुदुर्गात प्रवेश देण्याची भूमिका जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे. ७ ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्गात आल्यानंतर विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याबरोबरच ई-पास नसलेल्या वाहनांना प्रवेश नाकारण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मात्र, हा निर्णय अंतिम नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. करोनामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले असून सणांवरही करोनाचे संकट आले आहे. यामुळेच गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यत टाळेबंदीला आणखी एक आठवडा मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढल्यानंतर जिल्ह्यच्या विविध भागांत त्याचे तीव्र पडसाद उमटले. जनतेच्या जोरदार विरोधामुळे गुरुवारी हा आदेश लक्षणीय प्रमाणात शिथिल करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यतील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतील दुकाने खुली ठेवण्यासाठी आराखडा मंजुरीबाबतचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक दिवसाआड डाव्या-उजव्या बाजूची दुकाने खुली राहतील. रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या टाळेबंदी शिथिलीकरणानुसार १ जुलैपासून जिल्ह्यतील व्यवहार आणखी खुले होणे अपेक्षित होते. पण, जिल्ह्यत करोनाचे सामूहिक संक्रमण होत असल्याची लक्षणे दिसत आहेत, असे कारण देत ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवण्याचा निर्णय राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री उदय सामंत यांनी ३० जून रोजी पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्या वेळी जिल्ह्यातील टाळेबंदी ८ जुलैपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. ती मुदत बुधवारी संपत असल्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी संध्याकाळी उशिरा आदेश जारी करत आणखी एक आठवडा टाळेबंदी राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर निरनिराळ्या समाजमाध्यमांवर तीव्र विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. सतत मुदतवाढीमुळे जिल्ह्यातील व्यापार, उद्योगाला मोठा फटका बसला असून कष्टकरी वर्गाचे हाल होत आहेत, अशा भावना त्यातून व्यक्त झाल्या.