वडवळ येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप
सोलापूर : येणारा काळ शेतकऱ्यांचा असेल, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धती आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. वडवळ (ता. मोहोळ) येथील भक्त निवासात कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभप्रसंगी भरणे बोलत होते.
यावेळी माजी आमदार राजन पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार, तहसीलदार जीवन बनसोडे, सभापती रत्नमाला पोतदार, जि.प. सदस्य तानाजी खताळ, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे, उपसरपंच धनाजी चव्हाण, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, मृद शास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉ बी. एस. कदम, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषिमंत्री, आयुक्त, अधिकारी बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत, त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. मात्र पीक पद्धती, उसाच्या नवीन पद्धतीचा अभ्यास करून योग्य लागवड केली तर याचा फायदा होत आहे. उत्पन्न व बाजारपेठा पाहून नवनवीन प्रयोगाने पीक लागवड करा. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे असून नवीन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. यावेळी त्यांनी बनावट खते किंवा उगवत नसलेल्या बियाण्यांच्या तक्रारीबाबत कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचे सांगितले. येणारे 25 दिवस कोरोनामुळे खूप धोक्याचे आहेत.गरज असेल तरच शहरात जावा. कोरोनाला घाबरू नका पण योग्य काळजी घ्या. एकत्र जमू नका, मास्कचा वापर, साबणाने स्वच्छ हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना खते, बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.