मुंबई – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कॅबिनेट मंत्र्यांनीही अनेकदा भाष्य केले आहे. अशा आर्थिक संकटाच्या स्थितीतच राज्य सरकारने शालेय शिक्षण मंत्र्यांसाठी जवळपास 23 लाख रुपये किमतीच्या इनोव्हा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी “उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत टीकेची झोड उठवली आहे.
राज्य सरकारच्या वाहन आढावा समितीने विशेष बाब म्हणून या वाहन खरेदीसाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या समितीसमोर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, शिक्षण अपर सचिव आणि कार्यालयीन वापरासाठी एक अशा एकूण 6 वाहनांच्या खरेदीचे प्रस्ताव विचाराधीन होते. यापैकी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या वाहन खरेदीला मंजुरी मिळाली आहे. या इनोव्हा गाडीची किंमत (जीएसटी आणि इतर मिळून) 22 लाख 83 हजार रुपये आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच सरकारच्या निर्णयातील विरोधाभास लक्षात आणून दिला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल, असे म्हणतात. तर दुसरीकडे राज्य सरकार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि इतर मंत्र्यांसाठी 6 नव्या वाहनांना खरेदीसाठी मान्यता देत आहे. “उद्धवा अजब तुझे सरकार!’, असे ट्विट करत निशाणा साधला.