सोलापूर – एरव्ही प्रखर उन्हाळ्यासाठी ओळखल्या जाणा-या सोलापुरात यंदाचा उन्हाळा अधिक त्रासदायक ठरत आहे. मार्च महिन्यातच उष्मा प्रचंड वाढत असून मागील आठवडाभर तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसच्या पुढेच सरकत असताना मंगळवारी प्रथमच ४२ अंशांवर तापमान मोजण्यात आले. वाढत्या उष्म्यामुळे सोलापूरची वाटचाल आता ‘शोला’पूरच्या दिशेने होऊ लागली आहे.
यंदा दुष्काळाचे संकट आवासून उभे असताना उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दिवसभर उन्हाची तलखी जाणावत असून उष्म्यामुळे चालता फिरताना अचानकपणे चक्कर येऊन खाली कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. उलटी-जुलाबाच्या त्रासामुळे रूग्णांची संख्या वाढत आहे.
यंदाचा उन्हाळा फेब्रुवारीअखेरपासून जाणवत असून सुरूवातीला तापमान ३७ ते ३८ अंशांपर्यंत मोजले जात होते. मागील मार्च महिन्यात तापमानाचा पारा चाळिशी सर करून पुढे सरकत होता. मागील आठवडाभर दररोज ४१ अंशांपेक्षा जास्त तापमान होते.
२६ मार्च रोजी तापमान ४१ अंशांच्या पुढे सरकले. हा पारा वरचेवर वाढत ४१.६ पर्यंत गेले असताना मंगळवारी प्रथमच तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहोचला. वाढत्या उष्म्यामुळे दुपारी रस्त्यावरची वर्दळ घटली आहे.
सकाळी नऊपासून उन्हाचे चटके बसत असून दुपारी रस्त्यावर उन्हाच्या झळा जास्त त्रासदायक ठरत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत उष्म्याची धग जाणवत राहते. उष्म्यापासून बचाव करण्यासाठी थंडपेयांची मागणी वाढली आहे. विद्युत पंखे, कूलर, वातानुकूलित यंत्रांसह अन्य उपकरणांचा आधार घेतला जात आहे.