नगर -नगर शहरात मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करोना रुग्णांचा उपचार खर्च उचलत आहे. असे असले तरी काही पिवळे व केशरी रेशनकार्डधारक रुग्ण केंद्र व राज्याच्याही आरोग्य योजनेच्या निकषात पात्र ठरत नाही. अशा सर्व रुग्णांनाही सध्याच्या संकट काळात दिलासा मिळणे गरजेचे आहे.
यासाठी महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर नगर मनपा हद्दीतील अशा रुग्णांच्या उपचार खर्चाची तरतूद करावी, अशी मागणी नगरसेविका मीनाताई चोपडा यांनी केली आहे.
याबाबत निवेदनात चोपडा यांनी म्हटले आहे की, मागील साडेतीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे अर्थकारण ठप्प आहे. सर्वसामान्यांचे उत्पन्न थांबले आहे. अशावेळी करोनाची लागण झाली व संबंधित रुग्ण शासनाच्या आरोग्य विम्याच्या संरक्षणासाठी अपात्र ठरत असल्यास त्याला मोठा उपचार खर्च करणे आवाक्याबाहेरचे होते.
ही बाब ओळखून पुणे महानगरपालिकेने आपल्या हद्दीत अशा रुग्णांचा उपचार खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या अशा रुग्णांचे बील शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार पुणे मनपा भरत आहे.
नगरमधील वाढती रुग्णसंख्या पाहता मनपाने अशा निर्णयाची तयारी ठेऊन आवश्यक तरतूद केली पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना संकटकाळात मोठा आधार मिळू शकतो. सध्या शासन, प्रशासनाच्या प्रयत्नातून करोनाची परिस्थिती बरीच नियंत्रणात आहे.
यात महापालिका प्रशासनही चांगली भूमिका बजावत आहे. मात्र, येत्या काळात रुग्ण वाढल्यास त्यांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागू शकतो. अशावेळी त्यांच्यासमोर मोठ्या उपचार खर्चाचा प्रश्न उभा राहिल. यासाठी महापालिकेने तयारी करुन त्यासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही पाठपुरावा करावा. अशी मागणी त्यांनी केली.