“त्या’ अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाहीच
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आपल्या बॅंक खात्यावर लाच घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर दोन दिवसांत कडक कारवाई करावी, अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी आयुक्तांना केली होती. मात्र आयुक्तांनी महापौरांची ही सूचना धुडकावत संबंधितांना वाचविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू ठेवल्याचेच समोर आले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी एका ठेकेदाराकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी 4 जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघडकीस आणले होते. यावेळी आयुक्तांनी संबंधितांची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले होते मात्र कारवाई केली नाही. यानंतर कामठे हे न्यायालयात जाणार हे लक्षात आल्यानंतर तसेच भाजपाची होत असलेली बदनामी लक्षात घेऊन महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोमवारी (दि.29) पत्रकार परिषद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर दोन दिवसांत आयुक्तांनी कारवाई करावी, अशा सूचना केल्या होत्या.
या आदेशाला आता तब्बल पाच दिवस झाल्यानंतरही आयुक्तांनी “त्या’ लाचखोर अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई न केल्यामुळे महापौरांच्या आदेशालाही आयुक्त भीक घालत नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे महापौरांनी त्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर तात्काळ पाठवावे व चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासही आयुक्त राजी नसल्याचेच गेल्या पाच दिवसांतील घडामोडींवरून समोर आले आहे. आदेश धुडकाविणाऱ्या आयुक्तांबाबत महापौर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
बचावासाठी पळवाटा शोधण्याचे काम सुरू
बायोमेडिकल इंजिनियर हे पद महापालिकेमध्ये विशेषत्वाने निर्माण करण्यात आले आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई कशी करायची याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे सांगून सध्या कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आले. महापालिकेत निर्माण केलेले हे पद महापालिकेतील कायदेशीर तरतुदीनुसार करण्यात आले आहे. या पदाला संपूर्ण महापालिकेचे आणि राज्य शासनाचे नियम आणि कायदे लागू होतात. त्यामुळे कारवाई देखील याच कायद्यानुसार होणे अपेक्षित असताना केवळ भूलथापा देऊन संबंधितांना वाचविण्यासाठी सुरू असलेली धडपड खेदजनक असल्याची प्रतिक्रिया पालिका वर्तुळात उमटली आहे. वरदहस्त असलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी पालिकेच्या प्रशासन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी नैतिकताच सोडल्याची बाबही समोर आली आहे.