प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार ४०० स्केअरफुटाचे घर
जळोची(प्रतिनिधी) – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे काम करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपालिकेला दिले आहेत. त्यामुळे आता येथील गोरगरीब नागरिकांना लवकरच पक्की घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या आमराई भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सन १९८० रोजी बांधण्यात आली होती. मात्र ही इमारत जीर्ण झाल्यामुळे शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार इमारत धोकादायक ठरल्याने सदर इमारत सप्टेंबर २०१६ रोजी पाडण्यात आली. या इमारतीत राहणाऱ्या ९६ कुटुंबातील नागरिकांनी सदर इमारत पाडण्यास विरोध दर्शविला होता.
मध्यवर्ती ठिकाणच्या जागेपासून इतरत्र दूर अंतरावर वास्तव्यास जावे लागेल. या भीतीने स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. दरम्यान या प्रश्नावरून शहरात राजकारणही झाल्याचे पहावयास मिळाले. मात्र खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत सदर इमारतीमधील ९६ कुटुंबीयांना पक्के घरे बांधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पालिका पदाधिकारी व प्रशासनाने येथील नागरिकांना विश्वासात घेत इमारत खाली करून घेत. सदर कुटुंबियांचे जळोची येथे पत्र्याच्या शेडमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.
सदर वसाहतीच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण पडले होते. हे आरक्षण उठवून निवासी जागेचे आरक्षण टाकण्या संदर्भात पालिकेने ठराव केला. तरतुदीनुसार बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी मोठे परिश्रम घेऊन आरक्षण उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला व युतीचे सरकार असताना ही अवघ्या सहा महिन्यातच सदर जागेवरील खेळाचे आरक्षण उठविले. या कामात स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे यांनी आवश्यक ती मदत केली.
डॉ. आंबेडकर वसाहतीतील ९६ कुटुंबीयांना आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरे मिळणार आहेत. याशिवाय शेजारील जी २५ घरे बाधित झाली होती. त्यांचा ही यात समावेश करण्यात आला आहे.
या असणार सुविधा…
(1) एक बेडरूम व एक हॉल
(2) स्वयंपाक गृह
(3) स्नानगृह, शौचालय गॅलरी