नवी दिल्ली – देशापुढील संकटाच्या काळात कॉंग्रेस सारख्या मोठ्या पक्षाच्या माजी अध्यक्षाकडून उथळ राजकारण सुरू आहे असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, भारत विरोधी जो प्रपोगंडा सुरू आहे तो हाताळण्याची भारताची पुर्ण क्षमता आहे. पण या पार्श्वभूमीवर एका मोठ्या राजकीय पक्षाच्या माजी अध्यक्षाकडून जे उथळ राजकारण सुरू आहे ते दु:खदायक आहे.
राहुल गांधी यांनी मागच्या आठवड्यात मोदींना उद्देशून सरेंडर मोदी हा हॅश टॅग चालवला. तो देशभर खूप चालला. त्यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, या हॅशटॅगचा पाकिस्तान आणि चीनला लाभ झाला आहे. लडाखच्या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे.
या चर्चेपासून सरकार पळ काढत नाही. सन 1962 पासून सर्व विषयांवर आपण चर्चा करू पण सध्या आपले जवान सीमेवर लढत आहेत. सरकारनेही तेथील स्थितीच्या संबंधात ठाम भूमिका घेतली आहे. अशा वेळी चीन किंवा पाकिस्तानला लाभ होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. या विषयावर राहुल गांधी यांनी आत्मपरिक्षण करावे अशी सुचनाही शहा यांनी केली.