मुंबई – करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने आयोजित “ऑनलाईन अध्यापनाकरिता नवयुगातील साधने’ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राजभवन येथून उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वत:ला खचितच समाधान लाभणार नाही, असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कालप्रवाहानुसार अनेक गोष्टी बदलत असतात परंतु अध्यापनात काही गोष्टी शाश्वत असतात, असे सांगून नवतंत्रज्ञान स्वीकारताना शिक्षणातील शाश्वत मूल्ये जपली पाहिजेत. लहान मुलांच्या नेत्र आरोग्याचा विचार करून लहान मुलांच्या अध्यापनासाठी ऑनलाईन साधने खरोखरीच उपयुक्त आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही मत राज्यपालांनी व्यक्त केले.