डॉ. भाग्यश्री पाटील : नैसर्गिक फुलांना चांगला भाव मिळणेही शक्य
लग्न, समारंभात प्लॅस्टिक फुलांचा वापर करणे चुकीचे
पुणे – “प्लॅस्टिक फुलांवर बंदी आणल्यास शेतकरी आत्मनिर्भर बनतील. शेतकऱ्याने कष्टाने पिकविलेल्या फुलांना चांगला भाव मिळेल. फूलशेतीला चालना मिळेल. शेतकऱ्यांना कोणाच्या सहाय्यतेची गरज लागणार नाही,’ असे मत “राइज ऍन्ड शाइन बायोटेक’च्या मुख्य कार्यकारी संचालक डॉ. भाग्यश्री पाटील यांनी व्यक्त केले आहे.
लग्न, समारंभात प्लॅस्टिक फुलांचा वापर करणे चुकीचे असल्याचे सांगत डॉ. पाटील म्हणाल्या, “प्लॅस्टिक फुलांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही फुले पर्यावरणासही हानिकारक आहेत. लग्नकार्यात वापरलेली प्लॅस्टिक फुले काढून टाकली जातात. कित्येकदा ती फुले जनावरे खातात. त्यांच्या पोटात जातात. याउलट नैसर्गिक फुलांपासून खत तयार करता येते. यासाठी अधिकाधिक नैसर्गिक फुलांचा उपयोग झाला पाहिजे. कारण, ती शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली असतात.
नैसर्गिकपेक्षा प्लॅस्टिक फुलांच्या आयातीवर कस्टम ड्युटी कमी आहे. ती वाढवली, तर प्लॅस्टिकची फुले वापरण्याचे लोक टाळतील. शेतकऱ्यांचे भले होईल. नैसर्गिक फुले असणे म्हणजे घरात चैतन्य असल्यासारखे आहे. भारतीय संस्कृतीत देवाला भरपूर फुले वाहिली जातात. मात्र, करोनामुळे मंदिर बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कित्येक शेतकऱ्यांनी फुले फुकट वाटली. आता फूलबाजार सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. येथे मोठी उलाढाल होईल. नागरिकांनी नैसर्गिक फुले जास्त प्रमाणात वापरावीत. यातून शेतकऱ्यांचे जीवन चांगले होईल. तरूणांनी या क्षेत्रात अधिक प्रमाणात कार्यरत व्हावे. विकासासाठी खूप संधी आहे.
प्लॅस्टिक फुलांचा वापर टाळण्यासाठी कडक नियम आवश्यक आहेत. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. करोना परिस्थितीनंतर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल. यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. आम्ही त्या दृष्टीने पाठपुरावा करत आहोत.
– डॉ. भाग्यश्री पाटील, मुख्य कार्यकारी संचालक, “राइज ऍन्ड शाइन बायोटेक’