नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतरही राजकीय सभा का सुरु आहेत असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर सरकारवर टीका करण्यात येत आहे. याची दखल घेत भाजपने अखेर पुढचे दोन दिवस आपले सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज यासंदर्भातली घोषणा केली. व्हर्चुअल रॅलीजसह भाजप आपले सर्व राजकीय कार्यक्रम दोन दिवसांसाठी पुढे ढकलत असल्याचे नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्त भाजपचे नेते वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हर्चुअल रॅलीद्वारे संबोधित करत आहेत. भारत-चीन सीमेवरची घटना 15-16 जूनच्या मध्यरात्री घडली. त्याच दिवशी संध्याकाळी जे.पी.नड्डा यांनी एका रॅलीला संबोधित केलं. शिवाय काल रात्री दहा वाजेपर्यंत ते उद्या होणाऱ्या आसामच्या रॅलीच्या प्रसारातही व्यस्त होते. मात्र अखेर आज सकाळी या रॅलीज स्थगित करण्याचा निर्णय जाहीर झाला.
आजच जे.पी.नड्डा यांनी चीन सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वााहिली. मातृभूमीचे रक्षण करताना आपल्या जवानांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान कायम स्मरणात राहील. देश सदैव त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञ राहिल,अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. त्याच ट्वीटमध्ये त्यांनी पुढे भारतीय जनता पक्ष आपले सर्व कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकलत असल्याचेही जाहीर केले आहे.