फार पूर्वी एका देशात एक राजा राहात होता. एकदा त्याच्या राज्यावर आक्रमण होतं. हा राजा लढाई करून शत्रूला पिटाळून लावतो. मात्र, त्या लढाईत त्याचं एक बोट तुटतं. त्याला फार वाईट वाटतं. तो
पुनःपुन्हा आपल्या त्या तुटक्या बोटाकडे पाहून हळहळत राहतो. ते पाहून त्याचा मित्र त्याला म्हणतो, “इतके वाईट वाटून घेण्यासारखे त्यात काय आहे? आपण परचक्र परतवले, हे चांगलेच झाले. जिवावरचे बोटावर निभावले. जे होते ते चांगल्यासाठीच होते असा तू विचार कर.’ हे ऐकून राजाला मित्राचा फार राग येतो. माझे बोट तुटले तर ते चांगले कसे; असे म्हणून राजा त्याला तुरुंगात टाकतो.
पुढे काही दिवसांनी राजा आपले काही थोडे सैनिक बरोबर घेऊन एका जंगलात शिकारीसाठी जातो. सावजाचा पाठलाग करीत असताना राजाची आणि त्याच्या बरोबरच्या लोकांची चुकामूक होते. राजा वाट चुकतो. त्याच जंगलात काही नरभक्षक टोळ्या राहात असतात. तो दिवस पौर्णिमेचा असतो आणि त्या रानटी लोकांच्या प्रथेनुसार त्या दिवशी त्यांना एक नरबळी द्यायचा असतो. बळी देण्यासाठी एखादा माणूस सापडतोय का ते पाहण्यासाठी ते फिरू लागतात. वाट चुकलेला राजा आयताच त्यांना सापडतो. ते ताबडतोब त्याला बांधून आपल्या टोळीप्रमुखापुढे उभे करतात. त्यांचा नायक त्या दिवशीच्या विधीची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यास बोलावून घेतो. आलेला पुजारी बळी द्यावयाच्या राजाकडे नखशिखांत पाहतो. नकारार्थी मान हलवून म्हणतो, “ह्याचा देह पूर्ण नाही. आपल्याला पूर्ण शरीराच्या माणसाचा बळी द्यायचा आहे. याला तर एक बोटच नाहीय. असा अर्धवट बळी देऊन कसे चालेल?’
सगळ्या लोकांना ते पटते आणि टोळीचा नायक या राजाला सोडून देतो. राजा घरी येतो आणि विचार करू लागतो. बोट तुटले खरे; पण त्यातून काहीतरी चांगलेच झाले. त्याला मित्राची आठवण येते. तो बरोबरच बोलला होता हे त्याला पटते आणि तो मित्राची कैदेतून सुटका करतो. आपलेही असेच होते का? आपण फक्त वाईटच गोष्ट धरून बसतो का? त्याबद्दलच झुरत राहतो का? जे काही घडत असते, त्याचा आपण बरोबर अर्थ लावतो का? म्हणून “हे वाईट झाले, फार वाईट झाले…’ एवढेच घोकत न बसता पुढच्या गोष्टींकडे पाहणे नेहमीच हिताचे.
आज आपल्याला वाईट वाटणाऱ्या गोष्टीचे पुढे काय पर्यवसान होणार आहे हे आपल्याला माहीत नसते. कधीकधी तर आपण एवढे वरवरचा विचार करतो की, असे काही वाईटातून चांगले घडलेले आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. पण आधी मात्र आपण भरपूर मनस्ताप करून घेतलेला असतो. म्हणून आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी “कदाचित यातूनही काही चांगले घडू शकेल’ असे म्हणून जीवनाची पुढील वाटचाल आनंदाने चालूच ठेवावी.