जामखेड -करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून तंत्र व उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या. त्याचप्रमाणे 2020-21 या शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या नीट, युजी व महासीईटी परीक्षा रद्द करून विद्यार्थी व पालकांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी रत्नदीप मेडिकल फांऊडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नीट, युजी व सीईटी परीक्षेवेळी परीक्षा केंद्रावर होणारी विद्यार्थी व पालकांची संभाव्य गर्दी व त्या माध्यमातून होणारा करोनाचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नीट, युजी व सीईटी परीक्षेबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी व पालकांच्या जीवाचा विचार करून नीट युजी व सीईटी परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे शैक्षणिक वर्ष 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया राबविणे योग्य राहील, अशी मागणी डॉ. मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
करोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या सद्य परिस्थितीत नीट, युजी व सीईटी परीक्षा घेणे कठीण आहे. परीक्षा केंद्रावर होणारी गर्दी व त्यामाध्यमातून करोनाचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा रद्द करून बारावीच्या निकालाच्या आधारे यावर्षाची प्रवेश प्रक्रिया राबविली पाहिजे.
डॉ.विशाल देशमुख जामखेड.