शहांनी जाणून घेतले सर्व मुख्यमंत्र्यांचे मत
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरूवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी झालेल्या चर्चेत शहा यांनी लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत त्यांचे मत जाणून घेतल्याचे समजते.
देशात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. त्याची मुदत 31 मे यादिवशी संपणार आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात सर्वप्रथम 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याची मुदत तीनवेळा वाढवण्यात आली. चार टप्प्यांत मिळून लॉकडाऊनला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तसे असूनही देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
मागील आठवडाभरात तर करोनाबाधितांमध्ये दरदिवशी 6 हजारपेक्षा अधिक संख्येची भर पडत आहे. त्यामुळे भारत आशिया खंडातील सर्वांधिक करोनाबाधितांचा देश बनला. ती नोंद झाल्याच्या दिवशीच शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.