बशिरत : अम्फान वादळाचा तडाखा बसलेल्या प. बंगालला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यपाल जगदीप धनकर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह उत्तर 24 परगणा जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर एका व्हिडिओ मेसेज द्वारे त्यांनी ही मदत जाहीर केली.
या वादळात आणि त्यानंतर झालेल्या धुवाधार पावसाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. दरम्यान या भयावह वादळात 77 जण मरण पावले असल्याचे स्पष्ट झाले.
उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा आणि हुगली जिल्ह्यातही वादळचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला.
या वादळात झालेल्या घरांच्या नुकसानी खेरीज शेती, उर्जा आणि अन्य क्षेत्रांच्या हानीचे तपशीलवार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तणावाच्या आणि नैराश्याच्या काळात संपूर्ण देश बंगालच्या जनतेसोबत आहे, असे मोदी म्हणाले.