पुणे (प्रभात वृत्तसेवा): करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने लॉकडाऊनही वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे संकलन करण्यासाठी पुणे विभागात दहा विशेष केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्हानिहाय वेळापत्रकही जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. दरम्यान मार्चपासून राज्यात बहुसंख्य ठिकाणी करोनाचा प्रभाव वाढतो आहे. त्यानुसार लॉकडाऊनही वाढविण्यात आलेला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी व त्या जमा करण्यावरही विपरित परिणाम झाला आहे. सर्वच शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरकडे जमा केलेल्या नाहीत. मॉडरेटरनी त्या पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे जमा केलेल्या नाहीत. करोनामुळे शिक्षकांच्या मनात भिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी ते बाहेर पडलेले नाहीत.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय शिंदे, सचिव प्रा.संतोष फाजगे यांनी उत्तरपत्रिका संकलनासाठी जिल्हानिहाय खास केंद्राची व्यवस्था करावी अशी मागणी पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव बी.के.दहीफळे यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यासाठी राजा रघुनाथराव विद्यालय, वेल्हा तालुक्यासाठी नसरापूर येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेज येथे स्वीकृती केंद्र उभारुन शुक्रवारी (दि.22) उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड व मावळसाठी चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी 23 मे रोजी उत्तरपत्रिका जमा करता येणार आहेत.
अहमदनगर येथील कर्जत, श्रीगोंदा, जामखेड तालुक्तांसाठी 27 मे रोजी कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात, अहमदनगर शहर व ग्रामीण, पारनेर, पाथर्डी, राहूरी तालुक्यांसाठी 28 मे रोजी अहमदनगरमधील ए.ई.सो.चे भाऊसाहेब र्िफरोदिया हायस्कूलमध्ये, संगमनेर, अकोले तालुक्यासाठी 29 मे रोजी संगमनेरमधील भाउसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात श्रीरामपूर, नेवासा, राहाता, शेवगाव, कोपरगाव तालुक्यांसाठी 30 मे रोजी श्रीरामपूरमधील के.जे.सोमय्या हायस्कूलमध्ये उत्तरपत्रिका जमा करता येणार आहेत.
सोलापूरमधील बार्शी, करमाळा, माढा या तालुक्यांसाठी 23 मे रोजी बार्शीमधील सलाखे हायस्कूल, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला तालुक्यासाठी 24 मे रोजी पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यांसाठी 31 मे रोजी सोलापूरमधील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये उत्तरपत्रिका जमा करता येणार आहे. फॉर्म नंबर 1 व 2 ही परीक्षकांना जमा करावे लागणार आहेत.