नवी दिल्ली : कोरोनाचा भारतात प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातच भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्याची घोषणा केली आहे. ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटे ऑटोमॅटीक पद्धतीने रद्द होणार असून या तिकिटांचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार असल्याचे मंगळवारी रेल्वेने जाहीर केले. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस तसेच लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे.
Indian Railways cancels all tickets booked to travel on or before June 30th, 2020. Refunds given to all tickets booked till 30th June 2020. All special trains and Shramik Special train to however ply as usual. pic.twitter.com/5Pgs09WB2t
— ANI (@ANI) May 14, 2020
३० जूनपर्यंतची रेल्वे तिकिटे रद्द करण्यात आली असली तरी स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमीक विशेष ट्रेनची सेवा सुरुच राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये एसी कोच तसेच स्लीपर कोचचीही व्यवस्था असणार आहे. या ट्रेनसाठी वेटींगची सुविधाही उपलब्ध असणार आहे. मात्र या तिकिटांची संख्या मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीवरुन चालवण्यात येणाऱ्या विशेष १५ पॅसेंजर ट्रेनची सेवा कायम राहणार असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केलं आहे. चालवण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन आणि मेल्समध्ये स्लीपर कोचमध्ये २०० पर्यंत तर वन एसीमध्ये २०, टू एसीमध्ये ५० तर थ्री एसीमध्ये १०० पर्यंत वेटींगची सुविधा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चालवण्यात येणाऱ्या विशेष मेल ट्रेन्समध्ये महिला आणि वरिष्ठांसाठी विशेष डब्बा राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र या ट्रेनसाठी तत्काळ आणि प्रिमियम तात्काळची सेवा उपलब्ध नसेल असेही सांगण्यात येत आहे.