कोरेगाव भीमा -करोना विषाणूसारख्या मोठ्या संकटात मोठ मोठे उद्योग धंदे बंद असल्याने व जे उद्योग व्यवसाय चालू आहेत ते कमी कामगारांवर चालू आहेत. अशा परिस्थितीत देशात तिसरे लॉकडाऊन संपत आले आहे. महाराष्ट्रातील व परप्रांतीय मजूर वर्ग मोठ्या संख्येने शिरूर तालुक्यात आहेत. शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा या भागात शेकडो लहान मोठ्या कंपन्या आहेत. यातील कामगारांनी आता मिळेल त्या वाहनाने गावाकडची वाट धरली आहे.
शिरूर तालुक्यात वास्तव्यास असणारे मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील कामगारांना विशेष एसटी बसच्या माध्यमातून त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडविण्यात येत आहे. तर पहिल्या दिवशी 8 बस, दुसऱ्या दिवशी 38, तिसऱ्या दिवशी 64 अशा एकूण 110 बस सोडल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये 22 ते 25 प्रवासी बसविण्यात आले तर आत्तापर्यंत 2000 परप्रांतीय मजूर सोडण्यात आलेत, अशी माहिती शिरूरचे प्रांत संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
प्रांत स्वतः भरउन्हात कर्तव्य बजावताना दिसत आहेत. त्यांच्यासह तहसीलदार लैला शेख व त्यांची टीम चांगले काम करत आहेत. वैद्यकीय तपासणी करून शिरूरचे आगर व्यवस्थापक महेंद्र माघाडे एसटी बसची व्यवस्था पाहत आपले कर्तव्य पार पाडत आहेत.