नवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येत्या 20 एप्रिलपासून देशातील सर्व महामार्गांवर टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला वाहतूकदारांनी मात्र विरोध केला आहे. 25 मार्चपासून देशातील टोलनाके बंद करण्याचा आदेश सरकारने दिला होता.
पण आता गृहमंत्रालयाने येत्या 20 एप्रिलपासून देशातील काही व्यवहार पूर्ववत करण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महामार्गांवरील टोल वसुलीही सुरू करावी अशी सूचना महामार्ग व परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.
तथापि ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेस या वहातुकदारांच्या राष्ट्रीय संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. एकीकडे सरकार जीवनावश्यक वस्तुंची मालवाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दुसरीकडे वाहतुकदारांना मात्र टोल वसुली सुरू करून नाहक अडचणीत टाकले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुळात लॉकडाऊन मुळे सारा वाहतूक व्यवसाय अडचणीत आलेला असताना त्यांना मदत करायची सोडून सरकारने त्यांना या टोलचा भार टाकला आहे असा आक्षेपही या संघटनेने घेतला आहे.