‘लॉकडाऊन’चा परिणाम : नद्यांमधील पाणी पारदर्शी अन् नितळ झाले
पिंपरी (प्रतिनिधी) –“करोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात शहरातील पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीतील पाण्याच्या प्रदुषणाची स्थिती सुधारली आहे का, याची तपासणी करणारा उपक्रम इन्व्हर्नमेंट कॉन्झर्वेशन असोसिएशन (ईसीए) आणि टाटा मोटर्स यांनी संयुक्तपणे राबविला. नदीपात्रांतील एकूण 10 ठिकाणी तीन वेळा पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याचा अहवाल येत्या सोमवारपर्यंत (दि. 20) मिळणार आहे.
तपासणी उपक्रमात तिन्ही नद्यांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून 10 नमुने पहिल्यांदा 3 तारखेला घेण्यात आले. त्यानंतर 9 आणि 14 तारखेला पुन्हा त्याच ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले. मनपा पर्यावरण विभागाकडून संचारबंदीच्या कालावधीत अधिकृत परवाने घेऊन ही कार्यवाही करण्यात आली. हे सर्व नमुने टाटा मोटर्स कंपनीच्या पाणी तपासणी विभागाकडे सुपूर्द केले आहेत.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील तिन्ही नद्यांच्या प्रदूषणाची स्थिती सुधारली आहे का, याची तपासणी करण्यासाठी तीनदा पाण्याचे नमुने घेतले. त्याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत (दि. 20) अपेक्षित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाकडे अभ्यासासाठी सादर करण्यात येईल.
– विकास पाटील, चेअरमन, इसीए