सातारा – करोनामुळे सर्वकाही बंद असल्याने तसेच चिकन खाल्ल्याने करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय पुर्णपणे अडचणीत आला आहे. मार्केट बंद, त्यात अफवांचे वादळ, शिवाय आवश्यक असणारे खाद्य मिळत नसल्याने वाई तालुक्यातील विरमाडे या गावातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांच्या कोंबड्या फुकटात दिल्या आहे. करोनामुळे अडचणीत आलेला शेतकरी चांगलाच हतबल झाला आहे.
चीनच्या वुहानमध्ये जन्माला आलेल्या करोना विषाणुने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. भारतातही करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठमोठे उद्योग व्यवसाय बंद आहेत. करोनाचा नायनाट झाल्यावर हे व्यवसाय पुन्हा सुरु होतीलही मात्र, कर्ज काढून शेतीला जोडधंदा म्हणून किरकोळ व्यवसाय करणारे शेतकरी या करोनामुळे पुरते हतबल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करु लागला आहे. या पोल्ट्री व्यवसायासाठी शेतकरी सोसायट्या, अथवा बॅंकांचे कर्ज काढत आहे. सध्या करोनामुळे शेतकऱ्याच्या या जोड धंद्याला चांगलेच ग्रहण लागले आहे.
वाई तालुक्यातील विरमाडे या गावातील बरेचशे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. सध्या या व्यावसायिकांच्या पोल्ट्रीमधील कोंबड्या या विक्रीयोग्य झाल्या आहेत. मात्र करोनामुळे सर्वकाही बंद झाल्याने आता या कोंबड्यांचे करायचे काय? असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा होता. त्यातच चिकन खाल्ल्यामुळे करोना होतो अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्यामुळे कोणीही या कोंबड्या घेत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अखेर सोशल मीडियावरच या व्यावसायिकांनी “फुकटात कोंबड्या देणे आहेत, कोणीही या आणि कोंबड्या घेऊन जा’ असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चांगलीच झुंबड उडविली. सुमारे दहा ते बारा हजार इतक्या कोंबड्या या शेतकऱ्यांनी फुकटात दिल्या आहेत. अचानक आलेल्या या करोनाच्या रोगामुळे शेतकरी मात्र पुरता कर्जबाजारी झाला आहे.