मुंबई – पोरबंदर, वेरावळ इत्यादी भागातील मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या जवळपास एक हजार नागरिकांना दक्षिण गुजरमधील स्थानिक मच्छिमारांनी बंदरावर उतरण्यास नकार दिला होता. यामुळे बोटीवरील शेकडो खलाशी समुद्रात अडकून पडले होते. मात्र, गुजरात प्रशासनाने आता मध्यस्थी केली आहे.
दक्षिण गुजरात भागातील अनेक तरुण हे खलाशी म्हणून अन्य भागांमध्ये कामानिमित्त जात असतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने हे खलाशी पुन्हा आपल्या घराकडे निघाले आहेत. मात्र, दक्षिण गुजरातमधील नागोळ व लगतच्या मासेमारी बंदरावर स्थानिकांनी या मंडळीला उतरण्यास बंदी केली होती. यामुळे खलाशांनी गुजरातमध्ये शक्य न झाल्यास महाराष्ट्रातील झाई बंदरावर उतरण्याचे त्यांचे नियोजन होते. याबाबत पालघर जिल्ह्यातील मच्छीमार नेत्यांनी पालघरच्या जिल्हाधिकारी यांना सुचित केल्यानंतर त्यांनी डहाणू तालुक्यातील महसूल अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी तसेच तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत गुजरातमधील शासकीय विभागाने मध्यस्थी केल्यानंतर या खलासी मंडळीना नारगोळ-उमरगाव खाडीत उतरवण्यात येत असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.