अत्यावश्यक सेवेकरिता शहरातील 12,500 पुणेकरांकडून विनाकारण आग्रह
वाहतूक शाखा आणि सिटीग्लाईडकडून दिली जात आहे सेवा
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू केल्याने, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांसाठी वाहतूक बंद करण्यात आली असली तरी पुणे शहरात अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना वाहतूक शाखा आणि सिटीग्लाईडच्यावतीने 180 रिक्षांद्वारे सेवा पुरवण्यात येत आहे. मागील आठवडाभरामध्ये सुमारे साडे बारा हजार पुणेकरांनी केलेल्या फोनपैकी सुमारे 1300 पेक्षा अधिक जणांना ही अत्यावश्यक सेवा पुरवण्यात आली आहे.
9859198591 या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर प्रवास कोणत्या कारणासाठी करणार आहे, याची माहिती घेऊन त्या कारणाचा समावेश अत्यावश्यक सेवेत असल्यास रिक्षा उपलब्ध होत आहेत. या रिक्षा ही सॅनिटाईज करण्यात येत असून, प्रवास करताना रिक्षा चालक आणि प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. यासह रिक्षामध्ये रिक्षा चालकाकडून सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.
डायलिसिस, केमोथेरपीसह उपचारांसाठी ये-जा करणारे रुग्ण, बॅंक, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलिसांचे पासेस असणाऱ्या नागरिकांना प्रामुख्याने ही सेवा देण्यात येते. परंतु, घराबाहेर पडता येत नसल्याने काही पुणेकरांकडून क्षुल्लक कारणे देत या सेवेचा लाभ घेण्याचाही प्रयत्न होत आहे. वाय-फाय, इंटरनेट बंद असल्याने मित्राच्या घरी जायचे आहे. भावंडांना भेटायला जायचे आहे अशा कारणांसह अमूक-तमूक औषधे दुकानात जायचे आहे. यासह अनेक कारणे पुढे करीत ही सेवा मागितली जात आहे. तर, काही नागरिक साधारण सकाळच्या वेळात फोन करून रिक्षाचे बुकिंग करतात. सातत्याने पाठपुरावा करतात.
रिक्षा पीक-अप पॉइंटपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधिताचा फोन बंद लागतो, रिक्षा चालकांचा फोन स्वीकारत नाहीत. तर कधी रिक्षा चालकांना तुम्ही उशिरा आलात, असे सांगत रिक्षा रद्द केली जात असल्याचे सिटीग्लाइडच्या राहुल शितोळे यांनी सांगितले. नारिकांनी या अत्यावश्यक सेवेचा लाभ योग्य त्या कारणांसाठीच घ्यावा, पोलीस तसेच सिटीग्लाइड यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहनही शितोळे यांनी केले आहे.