मेलबर्न – आयपीएल स्पर्धा आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्वाची आहे, त्यामुळे कमी दिवस, कमी सामने अशा स्वरुपात का होईना पण ही स्पर्धा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधीक रकमेचा करार मिळालेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने केली आहे.
भारतासह जगभरात सध्या करोनामुळे कोणत्याही स्पर्धांचे आयोजन होत नाही, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हा धोका कधी संपुष्टात येईल हे देखील सांगता येत नाही. खेळाडूंचा जीव आयपीएलपेक्षा महत्वाचा आहे, मात्र तरीही पुढील काळात ही स्पर्धा होणे अत्यंत महत्वाचे आहे. टी-20 विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने आयपीएलमध्ये खेळणे आवश्यक आहे, असे कमिन्स म्हणाला.
भारतासह अनेक देशांनी करोनाच्या धोक्यामुळे काही क्रीडा स्पर्धा रद्द केल्या आहेत. तसेच काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, हा धोका इतक्यात संपुष्टात येण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. यंदाच्या मोसमासाठी लिलावात कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 15.50 कोटी रकमेचा करार देत आपल्या संघात घेतले आहे.