मुंबई – राज्यभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत १६ जणांना, तर पुण्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यातील संख्या ३२० झाली आहे.
देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात आहे. लॉकडाउनच्या काळातही करोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. आज हा आकडा ३२०च्या घरात पोहोचला. तर मंगळवारपर्यंत राज्यात १२ जणांचा मृत्यू झाला. यात पालघरमध्ये एक, तर मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण सापडले आहेत किंवा ज्या ठिकाणी करोनाग्रस्तांच्या संपर्कात येऊन करोनाची लागण झाली आहे, अशी ठिकाणं पालिकेच्यावतीनं सील करण्यात आली आहे. पोलिसांच्या मदतीनं बॅरिकेंटींग करून हे परिसर सील करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईतील ४८ जागा आहेत. यात मलबार हिल्स, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीसारख्या परिसरांचा समावेश आहे.