आरिफ शेख
करोना व्हायरसबाबत अमेरिका-चीनमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हायरसबाबत युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेची (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओ) सुरुवातीची भूमिका मात्र चीन धार्जिणी होती, हे आता समोर येत आहे. त्यांच्या या डोळेझाकपणामुळेच करोना हे जागतिक संकट म्हणून उभे ठाकले आहे. “डब्ल्यूएचओ’ने प्रारंभी घेतलेल्या गुळमुळीत भूमिकेमागील अन्वयार्थ…
करोना हे नैसर्गिक की मानव निर्मित? याची जगभर चर्चा सुरू आहे. हे जैविक युद्ध आहे की, अमेरिका-चीन दरम्यानच्या ट्रेड वॉरच्या वर्चस्वाची लढाई आहे? या मागील कर्ता करविता वूहानच्या प्रयोग शाळेतील चिनी सायंटिस्ट? की चीनमध्ये आलेले अमेरिकेचे सैनिक? वटवाघळं की खवल्या मांजर (पॅनगोलिन)? जगभर उद्रेक झालेला हा विषाणू चीनमध्ये काही दिवसांतच कसा काय आटोक्यात आला? प्राण्यातून माणसात प्रवेश करण्यासाठी या विषाणूला चीनचे रक्ताळलेले वेट मार्केट अन् सी-फूड मार्केट कारणीभूत होते? आदी असंख्य प्रश्नांनी जगभर काहूर उठविले आहे. यथावकाश याची उत्तरे समोर येतीलच.
भूतलावरील या जीवघेण्या संकटाबाबत युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका प्रारंभी काय होती, याची चर्चा जगभरात सुरू आहे. चीनने “डब्ल्यूएचओ’ची दिशाभूल केली. हा आजार दडवला. मग तो उशिरा सांगितला. त्याची तीव्रता कमी दर्शविली. हा संसर्गजन्य नाही, म्हणून 20 जानेवारीपर्यंत चीन दिशाभूल करीत होता, अन् सर्वात गंभीर बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटना त्यास खरं मानून निर्धास्त होती. लॉकडाउन अन् संचार बंदी कशी गैर आहे, हे चीनचे म्हणणे “डब्ल्यूएचओ’ पुढे रेटत होती. विदेशी माध्यमांनी अन् हॉंगकॉंग, तसेच तैवानमधील सूत्रांनी याचे गांभीर्य जगाला ज्ञात करून दिले, तरीही जागतिक आरोग्य संघटना झोपलेली होती. ही जागतिक महामारी आहे, हे त्यांनी 11 मार्चला जाहीर केले. तोवर चीन म्हणेल त्याप्रमाणे मान डोलवायचे काम जारी होते.
जगभरातील 193 देशांतील आजार, रोगराई, उपचार, निदान व उपाययोजना, वैद्यकीय मदत, संशोधन, सल्ला आदीद्वारे जगाचे आरोग्य जपण्याचे उत्तरदायित्व या संघटनेकडे आहे.करोना समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या लैकिकाप्रमाणे तत्पर व ठाम भूमिका का घेतली नाही? याचे उत्तर आता जगभर विचारले जात आहे. याचे रहस्य या संघटनेचे डायरेक्टर जनरल डॉ. टेड्रॉस आदनोम गेब्रोएसेस यांच्या निवडीत दडले आहे. युनोच्या सदस्य देशातून ही निवड केली जाते. डॉ. टेड्रॉस हे इथिओपिया या देशाचे माजी आरोग्यमंत्री. चीनच्या समर्थनातून ते सध्याच्या पदावर पोचले. डब्ल्यूएचओसाठी चीनने सर्वाधिक निधी देऊन या संघटनेला आधीच उपकृत केले होते. शिवाय इथिओपिया देशात चीनने मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. “वन बेल्ट-वन रोड’द्वारा तेथे अनेक विकासकामे जारी आहेत.डॉ. टेड्रॉस हे इथिओपियाच्या सत्ताधारी पक्षाचे नेते होते. या सर्व पार्श्वभूमीचा संदर्भ जागतिक आरोग्य संघटनेच्या चीन धार्जिण्या भूमिकेत दडला आहे.
करोनाचा पहिला रुग्ण कधी व कोठे सापडला? हे फक्त चीनला ठाऊक. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये चीनच्या वूहान मार्केटमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे बाह्य जगतात सांगितले जाते. चीन मात्र हा दावा फेटाळून लावतो. पहिला रुग्ण नोव्हेंबरला सापडला, अन् चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कळविले ते 31 डिसेंबर रोजी. तोपर्यंत चीनने जगापासून ही बाब दडविली होती. डिसेंबर अखेरीस हे जाहीर केल्यानंतरदेखील चीनने पुन्हा दिशाभूल केली. हा आजार सांसर्गिक नाही, सर्व काही ठीक आहे, असे तो निक्षून सांगत होता. अन् विशेष म्हणजे एखाद्या भोळसट अनुयायाप्रमाणे “डब्ल्यूएचओ’ने त्यावर विश्वास ठेवला.
अशा बाबतीत चीनचे ट्रॅक रेकॉर्ड तितके विश्वासार्ह नव्हते. 17 पूर्वी जेव्हा सार्स समोर आला तेव्हादेखील चीनने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हाचा डब्ल्यूएचओच्या सरसंचालक डॉ. ग्रो हार्लेम (ज्या नार्वेच्या माजी पंतप्रधान देखील होत्या) यांनी चीनची खरडपट्टी काढली. दक्षिण चीनमध्ये प्रवासाबाबत निर्बंध सुचविले. डब्ल्यूएचओच्या या कठोर भूमिकेमुळे सार्स आटोक्यात आला. शिवाय आठशे मृत्यूतच त्याचे तांडव थांबले. करोनावर चीनने जो बुरखा टाकला होता तो, टरकवला हॉंगकॉंगने, त्यांच्या सोर्सने दिलेल्या माहितीच्या आधारे गार्डियनने आठ जानेवारीला याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. वूहान शहर व हुबी प्रांतात करोनाने घातलेला हैदोस दबक्या आवाजात का होईना, चीनला मान्य करण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते, मात्र तोवर वेळ निघून गेली होती. हे सर्व जागच्या जागी दडपून (आता जे घडलेच नाही असा पवित्रा घ्यावयाचा असेल) ते बिंग फुटले खुद्द चीनच्या डॉ. ली यांच्यामुळे. त्यांना करोनाग्रस्त म्हणून बंदिस्त केले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा खरेच करोनामुळे मृत्यू होता की ली यांना त्यांच्या सत्यकथनाबाबत दिलेली शिक्षा, याची उलटसुलट चर्चा अजून थांबलेली नाही.
हे सर्व घडत असताना डब्ल्यूएचओ मात्र चीनच्या माहितीवर विसंबून होती. जर हा आजार चीन आटोक्यात आणू शकतो तर इतर देशांनाही तो आटोक्यात आणता आला असता. चीनने केलेल्या उपाययोजनांबाबत डब्ल्यूएचओ ने जगभरातील देशांना तत्काळ सूचित का केले नाही? आश्चर्याची बाब म्हणजे अनेक देशांनी ट्रॅव्हल ऍडव्हायजरी जारी केली. वूहानच्या विमान प्रवासावर बंदी घातली. तेव्हासुद्धा डब्ल्यूएचओ ने खो घातला. हे चुकीचे पाऊल आहे. करोना हा सांसर्गिक आजार नाही, हे चीनचे म्हणणे डब्ल्यूएचओ ने पुढे रेटले. डब्ल्यूएचओच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर तसे म्हटले गेले. सुमारे दोन महिने करोनाबाबतची माहिती चीनने दडवली अन् डब्ल्यूएचओ ने ती खरी मानली.
11 जानेवारीला डब्ल्यूएचओ ने ट्रॅव्हल बॅन व स्क्रीनींगची गरज नसल्याचे ट्विट केले. ही जागतिक महामारी असल्याचे जाहीर करायला 11 मार्च उजाडावा लागला. 30 मार्चपर्यंत करोनाने जगभरात 32 हजार बळी घेतले होते. अमेरिकेत 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण आहेत, तर त्यानंतर इटलीचा क्रम आहे. बरोबर एक महिन्यापूर्वी करोनाचे चीनमध्ये 79 हजार 251 रुग्ण होते. आज ही संख्य 82 हजारांपेक्षा अधिक नाही. एक महिन्यांपूर्वी जेव्हा चीनमध्ये 79 हजार रुग्ण होते तेव्हा जगात फक्त 435 केसेस होत्या अन् 67 रुग्णांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये महिन्याभरात फक्त तीन हजार रुग्ण सापडतात, तर याच कालावधीत जगभरात पाच लाख केसेस समोर आल्या. हे चित्र एवढ्या वेगाने कसे काय बदलले? या मागील कारणे व उपाय योजनात डब्ल्यूएचओची काहीच भूमिका नसावी? याबद्दल आश्चर्य वाटते.
डब्ल्यूएचओ याबाबत आता सतर्क झाली आहे, सल्ले व उपाययोजना जारी करीत असली तरी, “बैल गेला अन् झोपा केला’ प्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे. डब्ल्यूएचओवर विसंबून न राहता भारताने 16 जानेवारीला वूहानकडे जाणारी फ्लाइट रोखली. वूहान अन् मिलान (इटली) दरम्यान चर्मोद्योगाचा मोठा व्यापार आहे. त्याकरिता उभय शहरा दरम्यान मोठे दळणवळण आहे. चीनने आपल्या नागरिकांच्या परदेश गमनावर निर्बंध न लावल्याची किंमत आज इटलीला मोजावी लागते.