पालक, मुले रमू लागली गप्पागोष्टींमध्ये
पिंपळे गुरव – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, मुलांना रस्त्यावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वेगवेगळे कायदे करून संचारबंदी, जमावबंदी केल्याने पालकांना आपल्या मुलांना घरात घेऊन बसण्याशिवाय पर्याय उराला नाही. परंतु घरात बसून आता आपण सर्व “बोअर’ होत आहोत. परंतु घरात बसल्या बसल्या वेगवेगळ्या प्रकारचे बैठे खेळ आपण खेळलो तर आपल्या ठिकाणचा आळस व सतत काय करायचा हा प्रश्न संपुष्टात येईल. त्यातून वेळ तर जाईलच परंतु एक वेगळे काहीतरी आपण शिकल्याचे समाधान मिळेल.
लॉकडाऊनमुळे सर्वांना सुट्या आहेत. परंतु या वेळेत करायचे काय हा प्रश्न सर्वांसमोर आहे. लहान मुले ऐकत नाहीत असा अनेक पालकांचा प्रश्न आहे. त्यांना कसे समजून सांगायचे त्यांना करोना काय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार याची जाणीव नाही. पालक सतत घरात बसा असे सांगत आहेत. थोडे बाहेर पडले की रागवतात. त्यामुळे लहान मुलेदेखील वैतागले आहेत. परंतु पालकांनी त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याशी वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे. त्यांना या आजाराविषयी समजून सांगितले पाहिजे. त्यांच्याशी गप्पागोष्टी मारल्या पाहिजेत त्यातून ते घरातच बसतील व पालकांना होणारा त्रास कमी होईल.
सांगवीतील ओम नमोच्या वैशाली लोढा यांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. पालकांनी लहान मुलांबरोबर कसा संवाद साधावा, त्यांना एका ठिकाणी बसण्यासाठी कसे खेळात, कामात गुंतवावे, याचे मार्गदर्शन केले जात आहे. आपण घरात बसून राहिल्यास व प्रशासनाने दिलेल्या सूंचनांचे पालन केल्यास कोरोनाचे संकट आपण सहज पळवून लावू शकतो. त्यासाठी पालकांनी व मुलांनी घरातच बसणे आवश्यक आहे.
बालगोपाळांना शिकवली जातात घरातील कामे
दररोज ऑफिसला, कामाला जाण्यासाठी घड्याळाच्या काट्यांवर बांधलेले आई-वडील या काळात मात्र आपल्या मुलांसमवेत दिसत आहेत. त्यांच्या जोडीला बऱ्याच घरांमध्ये आजी-अजोबा आहेत. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद अनुभवण्यास मिळत आहे. सर्व एकत्र आल्याने घरातील मोठी माणसे आपल्या मुलांना घरातील कामे कशी केली जातात. भाज्या कशा निवडल्या जातात. चपाती, भाकरी कशी केली जाते, याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे पालकांसह मुलांचादेखील वेळ जात आहे. त्यामुळे सतत त्रास देणारी, बाहेर फिरण्यासाठी घेऊन चला म्हणणारी मुले आता घरात रमू लागली आहेत.
सर्वजण मिळून खेळतात विविध खेळ
चोवीस तास घरात बसण्याची वेळ आजपर्यंत कधीच काहीजणांवर आली नसेल. त्यामुळे या वेळेत घरात लहानथोरांसह सर्वजण काहीना काही खेळ खेळत आहेत. त्यात सापसिडी, चल्लस, खडे, गोट्या, पत्ते, चित्रकला, भांडीकुंडी असे विविध खेळ आज घराघरांमध्ये खेळले जात आहेत. तर ज्या घरात आजी-आजोबा आहेत ते आपल्या जीवनातील प्रसंग नातवांना सांगत आहेत. विविध गोष्टी, रामायण, महाभारतातील प्रसंग नातवांना सांगत आहेत. त्यामुळे लहान मुले घरातच बसून राहत आहेत. त्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्त्व विकास होण्यास याचा उपयोग होत आहे.