सातारा – गणेशवाडी (ता.खटाव) येथे शेतात मातीकाम करणार्या शेतकर्यांना कारवाईचा धाक दाखवून वडूज पोलिसांनी खिसा गरम केल्याची घटना घडली होती. याबाबत ‘प्रभात’ने “करोनाचा बंदोबस्त करण्याऐवजी वडूज पोलिसांचा शेतकर्यांवर डोळा” या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बळीराजा राबतोय म्हणूनच शहरी भागात लोकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला आहे. अन्यथा शहरातील लोकं भुकेने व्याकूळ होत रस्त्यावर आली असती. त्यामुळे शेतकर्यांना लुटणार्या पोलीस अधिकार्यासह त्यांच्या लाडक्यावर अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पवार यांनी केली. प्रभातच्या वृत्तानंतर त्यांनी दुरध्वनीवरुन त्यांची भूमिका स्पष्ट केली.
वडूज पोलिसांनी करोनाच्या संकटापेक्षा शेतात राबणार्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याला महत्व देत केलेली ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर आल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
वडूज पोलिसांनी गणेशवाडी (ता.खटाव) येथे शेतात काम करणारा ट्रॅक्टर व जेसीबी मालक तसेच शेतकर्याला कायद्याचा धाक दाखवून खिसा गरम करुन घेतला होता. मुळात शेती कामांना संचारबंदीच्या आदेशातून सुट असूनही केवळ तोडपाणीसाठी त्रास देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली होती. याबाबत प्रभात’ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पवार यांनी त्यांच्या संघटनेची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी पवार म्हणाले, शेतकरी अनंत संकटाचा सामना करुन जगतोय अन् जगवतोय असे असताना केवळ वैयक्तिक फायद्यासाठी त्रास दिला जात असेल तर दुर्दैवी आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर आरोग्य, पोलीस, आशा, कृषिसह इतर अनेक सरकारी यंत्रणा जीवावर उदार होऊन अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून सर्वसामान्य लोकांच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस संघर्ष करत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या परिस्थितीत घरात बसलेल्या लोकांना अन्नधान्य आणि भाजीपाला दूध पुरवणे हा सुद्धा अत्यावश्यक सेवेचा एक भाग आहे.
त्यामुळे इच्छा असो अथवा नसो शेतकरी वर्गसुद्धा जीवावर उदार होऊन ही कामे प्रामाणिक करत आहे.अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या मनात भय निर्माण होईल असे वागणे आपत्कालीन कायद्याच्या विरोधात होईल.कायद्याचे भय नक्की असावे मात्र, घडलेला प्रकार दुर्देवी आहे. जनतेच्या रक्षकाकडूनच असे प्रकार होत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ते खपवून घेणार नाही. आताच्या परिस्थितीत प्रशासनाला अडथळा नको म्हणून आम्ही सहकार्याची भुमिका घेत आहोत. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर याप्रकरणाचा नक्की पाठपुरावा केला जाईल असा इशारा पवार यांनी दिला आहे.