मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा विस्तार होऊन आता आठ दिवस उलटून गेले आहेत परंतु, खातेवाटपाबाबत कोणते खाते कोणाच्या वाट्याला येणार आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यावरून आता राज्यात राजकारण करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच मिळालेल्या खात्यावरून नाराजी नाट्यदेखील पहायला मिळत आहे. त्यामुळेच शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यावरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे सुद्धा मला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रीमंडळाच्या विस्तारावरदेखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्रिमंडळात कोणतेही खाते वजनदार किंवा कमी वजनाचे नसते. मिळेल त्या खात्यामध्ये काम चांगले काम करता येते. पण असे असतानाही खाते वाटपाबाबत तारीख पे तारीख का पडते आहे, हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच हे सांगू शकतील, असे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार कॉंग्रेसमधून शिवसेनेत आले होते. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज होते, अशी माहिती मिळते आहे.