मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे आज बरसल्या आहेत. १२ डिसेंबरला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त परळी मध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पंकजा बोलत होत्या.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप सोडणार नाहीच, पण कोणतही पद न घेता समांतर यंत्रणा उभा करण्याचा आपला इरादा असल्याचे बोलून दाखवले. तशी घोषणाही त्यांनी केली. आगामी काळात राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना उदयाला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१ डिसेंबरला पंकजांनी केलेल्या फेसबुक पोस्ट नंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. त्यामुळे या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. या काळात आपल्याकडे आमदारकी, खासदारकी, विरोधीपक्षनेतेपद नसणार, असे सांगताना त्यांनी आपल्याला भाजपच्या कोर कमिटीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाकडे केली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या संघर्षात भाजप असले की नसेल हे जरी निश्चित नसले तरी राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असणार हे नक्की.