मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत मात्र तरी देखील राज्यात स्थिर सरकार येताना दिसत नाही. त्यातच आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. या गोंधळात मुंबईत भाजपाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीला भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. राज्यात भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सद्यस्थिती ही तशीच असल्याचे मत त्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाच्या सहभागाचा फायदा मित्रपक्षांना झाला असून त्यामुळेच त्यांना अधिक जागांवर विजय मिळवता आला. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्याही अनेक मतदारसंघात प्रचार केला. परंतु शिवसेनेचा कोणताही नेता भाजपा उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, असेही त्यांनी म्हटले. भाजपा वगळता राज्यात कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, फडणवीस यांनी आमदारांना मुंबईत न थांबता जनतेची कामे करण्यासाठी जाण्याच्या सुचना केल्या. शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल हे नक्की आहे. परंतु सध्या त्यांना जाऊन मदत करावी, त्यांच्या दु:खात सहभागी व्हावं. सत्तेसाठी काम करणं हे आपलं लक्ष्य नसून जनेतेसाठी काम करणे हे आपले लक्ष्य असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.