जामखेड / मिरजगाव – कर्जत – जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रलंबित मागण्यासह विविध योजनांचे रखडलेले अनुदान तातडीने देण्यात यावे, यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच विभागीय कृषी संचालक दिलीप झेंडे यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी दोन्ही तालुक्यातील खोंबलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा निवेदन देऊन पाठपुरावा केला.
आमदार रोहित पवार यांनी कामाला सुरुवात केली असून तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून प्रलंबित असलेल्या कामाची माहित घेत संबंधित विभागाकडे स्वतः जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कर्जत- जामखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदाचाळींचे अनुदान प्रलंबित आहे. हवामान आधारित फळपिक विमा योजना राशीन महसुल मंडळामध्ये डाळिंब व फळबाग उत्पादक पिकासाठी विमा लागू झाला नाही. या विभागात डाळिंब व फळबाग शेतकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता, त्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
त्या फळबागांचे तात्काळ पंचनामे करुन तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. शेतकरी विमा योजनेमध्ये, प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम 2018-19 मध्ये ज्वारी व कांदा पिक विम्याची रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नाही. हरभरा, ज्वारी व इतर पिकांसाठी असणारा विमा काही लाभार्थींना मिळाला, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. त्या नामंजूर प्रस्तावाचे कारण दिले नसल्याने पूर्तता करणे शक्य झालेले नाही म्हणून त्या विमा कंपनीला अपुर्तेबाबत सूचना करण्यात येऊन तो प्रश्न मार्गी लावावेत.
कृषी आधारित फळपिक योजनेतून 2019-20 साली लिंबू व पेरू पिक वगळले आहे. लिंबू व पेरू पिक घेणारा शेतकरी या भागात मोठ्या प्रमाणात असून नैसर्गिक नुकसान झाल्यास त्याचा विमाही न मिळाल्यास बळीराजास संकटास सामोरे जावे लागेल. ही परिस्थिती एकट्या कर्जत जामखेडची आहे. याचप्रमाणे संपुर्ण अहमदनगर जिल्हा व महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असून योग्य ती मदत करणे गरजेचे आहे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.