दिवाळीनिमित्त मिळणारी साखर आलीच नाही
पिंपरी – दिवाळी सणानिमित्ताने शहरातील अंत्योदय शिधापत्रिका धारक गोरगरीब नागरिकांना दिवाळीसाठी मिळणारी जादा साखर राशन दुकानात उपलब्ध झालेली नसल्याने त्यांच्या दिवाळीतील गोडवा कमी झाला आहे. दरवर्षी दिवाळीनिमित्त तेल आणि अतिरिक्त धान्य मिळत असे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात तेल आणि अतिरिक्त धान्य मिळणे बंद झाले. तेल व अतिरिक्त धान्य बंद झाले असले तरी दिवाळीनिमित्त साखर मात्र मिळत होती. परंतु यावर्षी निवडणुकीमुळे साखरही सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात दाखल झाली नसल्याने गोर-गरीबांची दिवाळी यंदा गोड होणार नाही. विधानसभा निवडणुकीमुळे अन्न धान्य वितरण विभागातील अधिकारी इलेक्शन डयुटीमध्ये व्यस्त असल्याने साखर आली नसल्याचे बोलले जात आहे.
अत्यंत गरीब कुटुंबाना चांगले अन्न मिळावे, यासाठी “अंत्योदय’ शिधापत्रिका दिली जाते. अंत्योदय धारकांना अत्यल्प दरात धान्य पुरविले जाते. दर दिवाळीला त्यांना अतिरिक्त तेल, धान्य, साखर दिली जात असे. दोन वर्षांपूर्वी दिवाळी गोड होण्यासाठी शासनाकडून अतिरिक्त धान्य स्थानिक गोरगरिबांना मिळत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यात मोठया प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारकांना सरासरी एक किलो साखरेचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना आवश्यक धान्य हे दुसऱ्या दुकानातून जादा भावाने घ्यावे लागत आहेत. तर, तेल गेल्या दोन वर्षापासून मिळतच नसल्याने ते ही खुल्या बाजारातून महागड्या दराने घ्यावे लागत आहे. दरम्यान, त्याबाबत शहरातील राशन दुकानादारांनी सांगितले की, शासनाकडून साखर मिळत नसल्याने केवळ गहू व तांदूळ देण्यात येतात. 3 किलो गहू व 2 किलो तांदळाचे वाटप करण्यात येत आहे.
अपेक्षेने मारत होते चकरा
शहरातील निगडी, काळेवाडी आणि भोसरी या परिसरात अन्न धान्य वितरण कार्यालय आहे. मात्र, सर्वच भागात अशीच स्थिती आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिक धान्य व साखर मिळेल, या अपेक्षेने चकरा मारत आहे. सर्व प्रकारचे शिधापत्रिका धारक मिळून शहरात सुमारे दीड लाख शिधापत्रिकाधारक आहेत.
नियमित कोट्यातंर्गत मिळणारे राशन वाटप करण्यात आले आहे. परंतु खास दिवाळीनिमित्त “अंत्योदय’ शिधापत्रिका धारकांना दिली जाणारी साखर यंदा आली नाही.
-दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, निगडी