भाऊसाहेब वाडगे
मिरजगाव – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार असल्याने निवडणूक चांगलीच गाजत आहे. दोन्ही उमेदवार एकमेकांच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोण कोणावर भारी पडतो, याकडे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री राम शिंदे यांनी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चांगलीच आघाडी घेतली असून, रोहित पवारांच्या तोडीस तोड अशी प्रचार यंत्रणा उभारली आहे. पवार यांचे तगडे आव्हान असल्याने पालकमंत्री शिंदेही गंभीर होऊन प्रचारात उतरले आहेत.
पवार यांना आवाक्यात असणारी निवडणूक आता सोपी राहीली नाही. त्यांना चांगलीच फाईट द्यावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. पवार यांच्या उमेदवारीने सध्या मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातील तालुक्यातील प्रमुख नेत्यांना हाताशी न धरता थेट सर्वसामान्य मतदारांशी संपर्क साधला आहे. मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून आबासाहेब निंबाळकर यांच्या नंतर मंत्रिपदापासून व विकासकामांपासून वंचित होता.
शिंदे यांना युती सरकारमध्ये राज्यमंत्री नंतर कॅबीनेट मंत्री अशी बढती मिळाली. ते ज्या खात्याचे मंत्री झाले, त्या खात्यातील सर्वच योजना मतदारसंघात राबवल्याने विकासकामांची गंगा कर्जत तालुक्यात वाहू लागली. परंतु या काळात राम शिंदे यांचा सर्वसामान्य मतदार व कार्यकर्ता दुरावला. त्यामुळे त्यांच्या विषयी काही काळ मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर दिसत असल्याने त्याचाच फायदा पवार यांनी उठवला व राम शिंदे यांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.
तसा त्यांनी लोकसभेच्या वेळेसच विखेंना विरोध करुन आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत विखे यांना मिळालेले कमी मताधिक्य पाहूनच आपण या मतदारसंघात चांगली फाईट देऊ शकतो, असा विश्वास त्यांना आल्याने कॉंग्रेसचा मतदारसंघ असून, देखील त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा हिरमोड झाला. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची समजूत त्यांना शांत केले. असे असले तरी या सर्वच नेत्यांना आपणास विश्वासात घेत नसल्याची खंत असल्याने ते कितपत प्रचारात सक्रिय होतात, हे निकालावरुन दिसेल.