नगर – रात्रंदिवस मेहनत करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर भ्रष्ट महापरिक्षा पोर्टल मार्फत अन्याय केला जात आहे. अशा भ्रष्ट पोर्टल ऐवजी सर्व परिक्षा पारदर्शकपणे राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मंगळवार रोजी आंदोलन करण्यात आले.
स्पर्धा परीक्षेची रात्रंदिवस मेहनत करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर भ्रष्ट महापरीक्षा पोर्टल मार्फत होणाऱ्या गैर कारभारामुळे मोठा अन्याय होत आहे. त्यांचे अनेक प्रकरणे विविध माध्यमातून निदर्शनास आलेले आहेत. वेळोवेळी आंदोलने करून, देखील राज्य शासन यांची दखल घेत नाही. अशा भ्रष्ट पोर्टल ऐवजी सर्व परीक्षा पारदर्शकपणे राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली.
तसेच महापरीक्षा पोर्टल बंद करून, सर्व परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पद्धतीने घेण्यात याव्यात, पोलीस भरतीच्या 15 हजार जागा वाढून पारंपरिक पारदर्शक पद्धतीने भरती घेण्यात यावी. राज्य राखीव दलाच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात. मेगा भरतीच्या सर्वजागा पारदर्शक केंद्रीय पद्धतीने राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात याव्यात. राज्यसेवेतील पूर्व परीक्षेतील सी.एस.ए.टीचा पेपर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर घेण्यात यावा. सर्व परीक्षांचे पेपर अभ्यासक्रमाला धरून असावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रहार संघटनेचे अजय बारस्कर, जिल्हा प्रमुख परदेशी, प्रा. पिपंळे, धुळाजी महारनोर, विकास नागरे, प्रा जाधवर, वी.हजारे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.