पुणे – राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोर धरला असून कोकणसह विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आले आहेत. मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी आहे. मध्य भारतात असलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि पोषक स्थिती असलेला मान्सूनचा आस यामुळे राज्यात पाऊस वाढला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. घाटमाथ्यासह सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी सरी झाल्या. दरम्यान, पुण्यातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून थांबून थांबून पाऊस होत आहे. त्याचबरोबर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासांत पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.