पुणे – तापलेला विदर्भ आणि मराठवाडा अवकाळी पावसाने काही थंडावला आहे. त्यामुळे कमाल तापमानात तब्बल सहा ते सात अंशाने घट झाल्यामुळे 42 अंशावरील कमाल तापमान 35 अंशाच्या खाली गेले. मात्र, मध्य महाराष्ट्रातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, मालेगाव येथे सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
मागील आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्याला उष्णतेच्या झळामुळे नागरिक हैराण झाले होते. दोन्ही विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. त्यामुळे सकाळी ९ नंतर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते.
मात्र, अवकाळी पावसामुळे मागील तीन दिवसांपासून वातावरण बदल झाला आणि कमाल तापमान 42 अंशावरून थेट 35 ते 30 अंशापर्यंत खाली आले. त्यामुळे या भागात दिवसभर ढगाळ वातावरण, मध्येच गारपीट आणि रात्री गारवा अशी परिस्थिती आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आजही तापलेला असून, वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
शनिवारी (दि. 13) मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, पुणे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान जवळपास 39 ते 40 अंशाच्या आसपास आहे. तर विदर्भातील कमाल तापमान 30 ते 35 च्या आसपास असून, चंद्रपूर येथे सर्वात कमी 29 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील बहुतांश भाग तर विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्याला हवामानशास्त्र विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यातील कमाल तापमान
मालेगाव – 41, पुणे 39.1, अहमदनगर – 39, सातारा – 37.9, सोलापूर आणि जळगाव 38.7, सांगली 38.5, धारासशिव – 36.8, अकोला – 36.2, बुलढाणा – 35.6, वाशिम 34.2, परभणी – 32.9, मुंबई – 32.3, बीड – 32.2, नागपूर 31, यवतमाळ – 30.5, चंद्रपूर – 29.2,