आळंदी- श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे एकूण 10 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे मंगळवारी (दि. 20) श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांनी सुपूर्त केला.
दरम्यान, सामाजिक बांधिलकीचे जाणीवेतून देवसंस्थाकडून पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून आवश्यक तेथे संसार उपयोगी भांडी, धान्य, किराणा, शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ऍड. ढगे-पाटील यांनी सांगितले, त्यासाठी सांगली व कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क करण्यात आला असून त्यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मदत करणार आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थ व भाविकानांही ढगे पाटील यांनी मदतीचे आवाहन केले. व भविष्यात ही पूरग्रस्तांचे पुनर्वसनासाठी भरीव मदत करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतल्याचे सांगितले.